Friday, March 20, 2009

तिकोना


तिकोना हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। पवना धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० फुट उंच आहे। तुंग किल्ला ३-४ कि.मी अंतरावर दिसतो.किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले।

इतिहास-

इ.स.१५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. नेताजी पालकर कडे काही दिवस किल्ल्याची जबाबदारी होती।

गडावरील ठिकाणे-

गडमाथ्यावर त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळी व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात। बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे. लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केले आहे. वरच्या बाजुस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखविलेली आहे. खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा-

तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरुन थेट गडाच्या दरवाज्यात जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात.
मार्ग
पुणे - कोळवण बस घेउन गडाच्या पायथ्या्च्या थोडे जवळ जाता येते किंवा कामशेतहून
काळे कॉलनीमार्गे तिकोना पेठेत पोहोचता येते.

कोरीगड


कोरीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फुट उंच आहे. गडाला चहूबाजुंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजाची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान,मोरगड,राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो।

इतिहास-

११ मार्च १८१८ रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली। तीन दिवस लढुन यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेले दारुकोठार व गडावरील प्राणहानी मुळे शरणागती पत्करली.

गडावरील ठिकाणे-

कोराई देवीचे मंदिर -

गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुजी, शस्त्रसज्ज आहे. देवीची मूर्ति दीड मीटर ऊंच आहे.
गडावरील एकुण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे।

गणेश टाके -

गडावर दोन मोठी तळी आहेत। गडाच्या पश्चिम कडयाच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात.

गडावर जाण्याच्या वाटा-

गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पुर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुघई गुहा व श्री गणेशाची मुर्ती आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात.
लोण्यावळ्या पासून २५ कि. मी. वर शहापुरला खाजगी वाहनाने जाता येते.

तोरणा


तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. शिवाजी महाराजांनी घेतलेल्या पहिल्या काही किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रिच्या रांगेतून दोन पदर निघुन पुर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत तर दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात।

इतिहास-

शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा होय. गडावर तोरणा जातीची भरपुर झाडी असल्याने गडाचे नांव तोरणा पडले. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव 'प्रचंडगड' असे ठेवले.
पुण्याच्या नैऋत्येस पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पुर्व रेखांशावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस वेळवंडी नदी तर उत्तरेस कानद नदिचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेस कानद खिंड तर पुर्वेस बामण व खरीव खिंडी आहेत.
हा किल्ला कधी व कोणी बांधला याचा पुरावा उपलब्ध नाही। येथील लेण्यांच्या व मंदिरांच्या अवशेशावरुन हा शैवपंथांचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीत मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहित गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व त्याचे नांव प्रचंडगड असे ठेवले.

स्वारगेट बसस्थानकावरुन जाणार्‍या रा.प. मंडळाच्या गाड्या किंवा खाजगी वाहन. गडावर जाणारी वाटः कठीण - राजगड - तोरणा मार्गे.

Tuesday, March 17, 2009

अवचितगड


अवचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजुला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो। महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेला पिंगळसई गावापासून गडाची उंची ३०० मी. भरते. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजुंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा होता.

गडावरील ठिकाणे-

गडावर पाहण्यासारखे काही नाही. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दुसर्‍या दरवाज्यात पाण्याने भरलेला तलाव आहे. कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मुर्ती आहे। पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते। इथल्या रानात रानडुकरे, माकड, बिबळ्या, कोल्हे, इ। प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती,सुधागड, सरसगड, धनगड, रायगड, सवाष्णीचा घाट इ। परिसर न्याहळता येतो.

गडावर जाण्याच्या वाटा-

पिंगळसई मार्गः अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी / पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथुन दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर अंदाजे ५ कि.मी. आहे. येथुन गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते.
वेळः पिंगळसई मार्गे १ तास. [पडम मार्गे २ तास]

जीवधन


जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.घाटघरच्या परिसरात असलेला हा पुर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता। नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय!

इतिहास-

शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणार्‍या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय. १७ जुन १६६३ रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवुन संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणुन घोषित केले व स्वतः वजीर बनले.गडाचा दरवाजा हा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे।

गडावरील ठिकाणे-

पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. स्थानिक लोक याला "कोठी" म्हणतात. दक्षिण दिशेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. आसपास पाण्याची टाकी आहेत. गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे आहेत. कोठारामधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धाता या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते.
आयताकार असणार्‍या या गडाच्या टोकाला सुमारे २००० फुट उंचीचा "वानरलिंगी" नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे।

गडावर जाण्याच्या वाटा-

१.कल्याण-अहमदनगर मार्गे नाणेघाट चढुन गेल्यानंतर एक पठार लागते. या पठाराच्या उजव्या बाजुला जाणारी वाट व वानरलिंगी नजरेसमोर ठेऊन चालत रहावे. वाटेत दोन ओढे लागतात व त्यानंतर उभी कातळभिंत. या भिंतीला चिटकुन उजव्या हाताला असणारी वाट गडाच्या पश्चिम दरवाजाकडे जाते. इ.स. १८१८च्या युद्धात इंग्रजांनी ही वाट चिणुन काढली व पश्चिम दरवाजाची वाट बंद केली। वानरलिंगीची ही वाट नावाप्रमाणे वानरयुक्त्या करुनच पार करावी लागेते. ही वाट अवघड आहे, त्यामुळे जरा जपुनच चढावे.

२. जुन्नर - घाटघर मार्गे असणारी ही वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयिस्कर वाट असली तरी, एक-दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायर्‍या पार कराव्या लागतात, त्यामुळे सोबत एखादा दोर जरुर ठेवावा.
राहण्याची सोयः नाही.
जेवणाची - पाण्याची सोयः जेवणाची स्वतःच करावी, पाण्याची बारमाही टाकी आहेत.
गडावर चढण्यासाठी लागणारा वेळः जुन्नर - घाटघर मार्गे - अंदाजे २ तास.

भुलेश्वर


भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे। हे ठीकाण महादेवांच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिध्द आहे. मुळतः हे ठीकाण "मंगलगड" असे होते. मंदिराचे बांधकाम १३व्या शतकातले असुन भिंतीवरील कोरीवकाम व मुर्तीकाम अद्वीतीय आहे. लढाईच्या काळात बर्‍याच मूर्त्याची तोडफ़ोड करण्यात आली. स्त्री रुपातील गणपतीची मुर्ती मी पहिल्यांदाच या मंदिरात पाहिली. गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पुजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरातत्रीला येथे खास गर्दी होते.

पुण्यापासून अंदाजे ५० कि।मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे सहा आसनी रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते.

Monday, March 16, 2009

आळंदी


महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधी स्थान आहे। संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. आळंदी हे "देवाची आळंदी" असे देखील ओळखले जाते.

आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे। संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे।

समाधी मंदिर अतिशय सुंदर आहे। हे मंदिर १५७० मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव भेटीस जाण्याकरता वापरलेली भिंत आपण येथे पाहू शकता।

आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाणारी ज्ञानेश्वरांची पालखी प्रसिद्ध आहे। या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे १५० किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात।

आळंदीतील इतर प्रेक्षणीय स्थळे -

मुक्ताई मंदिर

राम मंदिर

कृष्ण मंदिर

स्वामी हरिहरेंद्र मठ

विठ्ठल रखुमाई मंदिर

Sunday, February 1, 2009

श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान- कारंजे


श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेले हे गाव आज लाड कारंजे या नांवाने ओळखले जाते। शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले हे गाव वर्‍हाडांतील अकोला जिल्ह्यात आहे. हे स्थानच श्रीगुरुंचे जन्मस्थान होय, हे प्रथम श्रीवासुदेवानंद सरस्वतींनी प्रकट केले. येथील काळे उपनावाच्या घराण्यांत श्रीगुरूंनी जन्म घेतला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणीं आहेत.

श्रीगुरूंचें जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारें साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्याचे मुनीम श्री। घुडे यांना विकला गेला. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती श्रीब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ श्रीलीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र व. 1, श. 1856 या दिवशी श्रीगुरूंच्या पादुकांची स्थपना केली आणि पूजेअर्चेची शाश्वत व्यवस्थाही केली. श्रीलीलादत्तांच्या निष्ठेने आरि कर्तृत्वानें प्रसिद्धीस आलेले हे स्थान आज हजारों दत्तोपासकांच्या नित्य-नैमित्तिक गर्दीने गाजते-जागते बनलें आहे.

या स्थानाचें प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्रीकरंजमाहात्म्य' नांवाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचें नाव वशिष्ठ ऋषीचे शिष्य करंजमुनी यांच्याशी निगडित आहे. कारंजे येथें जैनांचे हस्तलिखित ग्रंथांचें मोठें भांडार आहे.

दत्तोपासनेचे प्राचीन स्थान- गिरनार


सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे। नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतिप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणीं समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे.

गिरनारवर जैन मंदिर, एका पीराचा दर्गा, गोरखनाथ मंदिर, शिवमंदिर, दोन देवीचीं मंदिरें व दत्तमंदिर अशी मंदिरे आहेत। हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरु गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायर्‍या आहेत. दत्तस्थानापर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायर्‍यांची चढ-उतार करावी लागते.

दत्तोपासनेच्या इतिहासांत गिरनारचा महिमा विशेष आहे। त्या तपोभूमीत दत्त दर्शनाचा घ्यास घेऊन तप आचरणारे अनेक ज्ञाताज्ञात महात्मे होऊन गेले. निरंजन रघुनाथ, किनाराम अघोरील नारायणमहाराज जालवणकर इत्यादी दत्तोपासकांना गिरनारवरच दत्तसाक्षात्कार झाला आहे. अनंतसुत विठ्ठलाने 'दत्तप्रबोधां' त गिरनारचें माहात्म्य असें वर्णिलेलें आहे :

एक शृंगावरी गोरक्षनाथ । दुसरे शृंगावरी हिंगळजादेवी असत ।

तिसरे शृंगावरी स्वयें अवधूत । विश्रांती घेत हिंडतां ।।

नवनाथ चौर्‍यांशी सिद्ध। येथें वसती गा प्रसिद्ध ।

दत्त अविनाश तूं स्वतां सिद्ध । अद्वय अभेद्य सर्वातीत।

हिंदु आणि मुसलमान । यांसाठीं रूपें दोन ।

दत्त दातार अभिमान । द्वयस्थान शोभविलें।।

दत्तोपासनेतील सर्वोच्च स्थान-गाणगापूर


हे स्थान पुणे-रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा-अमरजेच्या संगमस्थानी आहे। श्रीनरसिंह सरस्वती येथे वाडीहून आले आणि सुमारें तेवीस वर्षे येथें राहून येथूनच श्रीशैलाकडे त्यांनी गमन केले. त्यांच्या दोन तपाएवढ्या प्रदीर्घ सन्निध्यामुळे हे स्थान दत्तोपासनेच्या क्षेत्रात सर्वोपरी महिमान पावलें आहे. श्रीगुरु जेव्हां येथे आले, तेव्हा प्रथम ते संगमरावरच राहत. नंतर ते गांवांत बांधलेल्या मठात राहू लागले. या मठाच्या स्थानीच त्यांच्या पादुका आहेत.

वाडीच्या पादुकांना 'मनोहर पादुका' म्हणतात, तर तेथील पादुकांना 'निर्गुण पादुका' अशी संज्ञा आहे। जणू वाडी येथे असताना त्यांच्या सगुण रूपाची दीप्ति कळसास पोचली होती - 'मनोहर बनली होती, तर येथें ते देहातीत- गुणरुपातीत होऊन 'निर्गुण' स्वरूप पावले होते. गुरूवार हा इथला पालखीचा वार. नित्योपासना दररोज पहाटेपासूनच सुरू होते. येथील पादुकांना जलस्पर्श करीत नाहीत, केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. येथील 'निर्गुण पादुका' चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत 'उदक' सोडतात.

पादुका असलेला मठ गांवाच्या मध्यभागी आहे। मठाच्या पूर्वेस महादेवाचें स्थान आहे. दक्षिणेस औदुंबर व त्याखाली महादेव-पार्वती यांच्या मूर्ती ‍आहेत, पश्चिमेस अश्वत्थानचें झाड आहे. अश्वत्थाच्या पराभोंवती नागनाथ, मारुती यांची स्थाने व तुळशीवृंदावन आहे. मठांतील पादुकांच्या गाभार्‍याला द्वार नाही. दर्शनार्थ एक चांदीनें मढविलेला लहानसा झरोका आहे. या झरोक्यांतून दर्शनार्थींनी श्रीगुरूंच्या त्या चिरस्मरणीय 'निर्गुण पादुकां'चे दर्शन घ्यावयाचें असतें. अनेक साधकांना या पादुकांच्या ठायींच श्रीगुरूंचें दिव्य दर्शन झालें, असें सांगतात.

गावापासून एक मैल अंतरावर भीमा-अरमजा-संगम आहे। संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. संगमावरील संगमेश्वराच्या देवालयापुढें श्रीगुरूंची तपोभूती आहे. गाणगापूरच्या परिसरांत षट्‍कुलतीर्थ, नरसिंहतीर्थ, भागीरथीतीर्थ, पापविनाशीतीर्थ, कोटितीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथतीर्थ अशीं अष्टतीर्थे आहेत

गाणगापूरच्या उत्सव-संभारांत दत्तजयंती आरि श्रीगुरूंची पुण्यतिथी या दोन उत्सवांचे विशेष महत्व आहे. श्रीगुरूंचें सर्व जीवनकार्य गाणगापूर येथेंच घडलें आणि आपल्या दिव्योदात्त विभूतिमत्त्वाचें सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूंत संक्रमित केलें. त्याचमुळें गेली पांच शतकें हे स्थान दत्तोपासकांच्या हृदयांत असीम श्रद्धेचा विषय बनले आहे.