Monday, December 1, 2008

भाविकांचे श्रध्दास्थान शिर्डीचे साईबाबा


अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील 'शिर्डी' हे आधुनिक भारतातील तीर्थक्षेत्र बनले आहे। साईबाबांच्या वास्तव्याने पुनित झालेले एकेकाळचे खेडेगाव आता शहर बनले आहे. बाबांचा आधार घेण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे येत असतात. मनमाड अहमदनगर या राज्य मार्गावर हे गाव वसलेले आहे.

अलौकिक विभूती असलेले सदगुरू श्री साईबाबा शिर्डीत प्रकटले व जवळपास 60 वर्षे आपले मानवी वेशातील अवतारकार्य पूर्ण करून येथेच समाधीस्थ झाले। शिर्डीस येणे, वास्तव्य करणे हीच मोठी साधना असल्याचा प्रत्यय स्वत: साईबाबांनी घेतला व तोच इतरांनाही येत असतो. श्री साईबाबांच्या पवित्र पदस्पर्शाने व अलौकिक अवतार कार्याने पावन झालेली ही पुण्यभूमी आज सर्वच जाती-धर्मातील पंथ, संप्रदायातील लोकांना मुक्त प्रवेश असणारे ठिकाण आहे.

श्री साईबाबांनी आपल्या अवतारकार्यात आपल्या भक्तांना आश्वासन दिलं होतं, ''माझ्या देहत्यागानंतर माझी हाडं माझ्या तुर्बतीतून बोलतील... मुंग्यांसारखी माणसांची रीघ लागेल।'' त्याचा प्रत्यय आज येतो आहे. शेकडो, हजारो, लाखो भाविक देशाच्या कानाकोपर्‍यातून, विदेशातून शिर्डीला गर्दी करीत आहेत. येथूनच बाबांनी संपूर्ण जगाला 'श्रध्दा-सबूरी' हा महामंत्र दिला. त्याचमुळे बाबांचे समाधीस्थळ लाखो भाविकांच्या मनाला उर्जा देणारे केंद्र बनले आहे. शिर्डीस आल्यावर श्री साईबाबांच्या दर्शनानंतर प्राप्त होणारी मन:शांती, मिळणारा आत्मविश्वास, परम् मन:शांतीचा येणारा प्रत्यय यामुळे शिर्डी हे जगातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.

श्री साईबाबांचे समाधी मंदिर -

हे मुख्य मंदिर आहे। मंदिराची ही इमारत नागपूरचे निस्सीम साईभक्त श्री. गोपाळराव बुट्टी यांनी बाबांच्या आशीर्वादाने बांधली होती. म्हणून 'बुट्टी वाडा' या नावानेही ती ओळखली जाते. १५ ऑक्टोबर १९१८ रोजी विजयादशमीच्या दिवशी बाबांनी आपल्या ऐहिक जीवनाचे सीमोल्लंघन केले आणि त्यांच्या व्यक्तव्यानुसार त्यांचा देह या वाड्यात ठेवण्यात आला, ते आजचे समाधी मंदिर होय. या ठिकाणी श्री साईबाबांची पवित्र समाधी व मूर्ती आहे. समाधी मंदिरात दररोज नित्य पूजा, अभिषेक व चार आरत्या होतात.

गुरूस्थान -

बाबा सोळा वर्षांचे असताना ज्या ठिकाणी प्रथम दृष्ट्रीस पडले ते हे समाधी मंदिर परिसरातील ठिकाण, त्यांच्या गुरूचे आहे, असे बाबा सांगत असत। श्री साईसच्चरितात उल्लेख असलेला प्रसिध्द निंब वृक्ष येथेच आहे. या ठिकाणी गुरूवारी व शुक्रवारी उद (लोबान, धूप) प्रज्वलित केल्यास भाविकांचा दु:ख परिहार होतो, असे श्री साईसच्चरितात म्हटले आहे.

द्वारकामाई(मशीद) -

बाबा शिर्डीस आल्यापासून समाधीस्थ होईपर्यंत त्यांचे वास्तव्य सलग 60 वर्षे समाधी मंदिर परिसरातील या ठिकाणी होते। असंख्य भक्तांना या ठिकाणी बाबांनी कृपाप्रसाद दिला. बाबा ज्या शिळेवर बसत असत, ती येथेच आहे. शिवाय बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी या ठिकाणी अखंडपणे प्रदीप्त आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाबा याच धुनीतून त्यांना उदी देत असत. आताही भक्तांना द‍िली जाणारी उदी याच धुनीतून प्राप्त होते. बाबा येथे अन्न शिजवून भक्तांना वाढीत असत.

चावडी -

एक दिवसाआड बाबा या ठिकाणी मिरवणूकीने द्वारकामाईतून येत असत व मुक्काम करीत असत। समाधी मंदिर परिसराच्या जवळच पूर्वेला चावडी आहे. आता प्रत्येक गुरूवारी रात्री 9:15 ते 10:00 या वेळी द्वारकामाईतून चावडीकडे पालखी मिरवणूक निघत असते. या पालखीतच बाबांची तसबीर, सटका व पादुका ठेवलेल्या असतात.

लेंडीबाग-

समाधी मंदिर परिसरातच असलेल्या या ठिकाणी बाबा फेरफटका मारावयास जात असत. बाबांनी स्वत: या ठिकाणी लावलेल्या पिंपळ वृक्षाशेजारी नंदादीप अखंडपणे तेवत ठेवलेला आहे. शिवाय या ठिकाणी दत्तमंदिर असून बाबांचा आवडता घोडा श्यामकर्ण (श्यामसुंदर) जवळच चिरनिद्रा घेत आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरीस 'बाबांची शिवडी' असे म्हटले जाते

No comments: