Thursday, November 20, 2008

गोव्यातील हिरवीगार सृष्टी!

वर्षाची पहिली पर्जन्याची धारा, न्हाणूनिया गेली भूमिभाग हासध्या बरसणाऱ्या पावसाने सारी सृष्टी हिरवीकंच झाली आहे. खरे तर ज्येष्ठाच्या सुरवातीलाच पाऊस पडला आणि आसुसलेल्या धरतीला नवचैतन्य प्राप्त झाले. "वर्षाची पहिली पर्जन्याची धारा, न्हाणूनिया गेली भूमिभाग हा सारा, लागली खुलाया अन तिजवरती, या तृणांकुरांची हिरवी, कवळी नवती' असे स्वरूप सगळीकडे दिसू लागले आहे. पावसाळ्यातल्या निसर्गाने सगळ्यांनाच मोहिनी घातली आहे. त्यात कवींवर तर त्याने जादूच केली आहे. बालकवी, ना. धो. महानोर, ग्रेस, डॉ. वसंत सावंत, शांता शेळके, बा. भ. बोरकर यांनी या निसर्गाचे चित्रण करणाऱ्या अनेक कविता लिहिल्या आहेत. बोरकर हे तर गोव्याचेच. त्यांनी चितारलेला निसर्ग इथे हुबेहूब आपल्याला दिसेलच, पण शांता शेळके यांनी चितारलेल्या निसर्गाचीही अनुभूती आपल्याला येऊ लागली आहे. शांता शेळके एकीकडे म्हणतात, "पलीकडे कुरणात बाळे खेळती गोजिरी, सूर त्यांचे उल्लासाचे चढतात वाऱ्यावरी.' अशाच प्रकारे कुरणात खेळणाऱ्या लेकरांचे चित्रण बोरकरांनीही आपल्या एका कवितेत केले आहे. "फुलती पत्री सुख सर्वत्री जीवन गात्री स कुरणांतुनि जल तुडवीत उडवित बागडती लेकरे.'

No comments: