Friday, November 28, 2008

संत सिंगाजीचे समाधी स्थळ


संत कबीरांच्या समकालीन असलेल्या संत सिंगाजी महाराजांची समाधी मध्यप्रदेशातील खंडव्यापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'पीपल्या' गावात आहे। येथील गवळी समाजात जन्मलेले सिंगाजी एक सर्वसामान्य व्यक्ती होते. परंतु, मनरंग स्वामीचे प्रवचने आणि त्यांच्या सानिध्यात आल्यामुळे सिंगाजीचे ह्दय परिवर्तन होऊन त्यांनी धर्माचा मार्ग स्विकारला. मालवा-निमाडमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेले सिंगाजी महाराज गृहस्थ असूनही त्यांनी आपल्या जीवनात निर्गुण उपासना केली. तिर्थ, व्रत इत्यादींवर त्यांचा विश्वास नव्हता. सर्व प्रकारचे तिर्थ मनुष्याच्या मनात असून जो आपल्या अंर्तमनात झाकून बघतो, त्याला सर्व तिर्थांचा लाभ होतो असे ते म्हणत असत. आपल्या मधुर वाणीच्या माध्यमातून तत्कालीन समाजात त्यांनी व्यापक बदल घडवून आणले होते.

एकदा त्यांना ओंकारेश्वर ज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी चला असे म्हटले असता त्यांनी जेथे पाणी आणि दगड आहे, तेच तिर्थस्थान असल्याचे सांगून पीपल्या गावाजवळ वाहत असलेल्या एका नाल्याच्या पाण्याला गंगेचे पवित्र पाणी समजून त्यात स्नान केले होते। ईश्वराची पूजा करण्यासाठी सिंगाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे मंदिर बनविले नाही. संत सिंगाजी महाराजांना साक्षात परमेश्वराने दर्शन दिले होते, असे सांगितले जाते। आपल्या गुरूच्या सल्ल्यानुसार, श्रावण शुक्ल नवमीच्या दिवशी ईश्वराचे नामस्मरण करत त्यांनी समाधी घेतली होती. आपली शेवटची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे सहा महिन्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांच्या स्वप्नात जाऊन आपल्या देहाला बैठकीच्या स्वरूपात समाधी देण्याचे सांगितले होते. त्यानुसार पुन्हा त्यांच्या देह उकरून त्यांना बैठ्या रूपात समाधी देण्यात आली.

सिंगाजी महाराजांचे समाधी स्थळ इंदिरा सागर परियोजनेच्या पाण्याखाली येत असल्यामुळे समाधी स्थळाच्या आजूबाजूला 50 ते 60 फूट उंचीचा ओटा तयार करून त्यावर मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे। मंदिराचे बांधकाम सुरू असल्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराजांच्या चरण पादुका तात्पुरत्या स्वरूपात जवळील परिसरात स्थलांतरीत केल्या आहेत.

या समाधी स्थळावर दर्शनासाठी‍ आलेले भाविक उलटा स्वस्तिक काढून आपली मनोकामना मागतात. आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भाविक सिंगाजींच्या दरबारात सरळ स्वस्तिक तयार करून अर्पण करतात. महाराजांच्या निर्वाणानंतर आजही त्यांची आठवण म्हणून शरद पोर्णिमेच्या दिवशी येथे जत्रा भरते. हजारो भक्त त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. कसे पोहचाल: रस्तामार्ग- या ठिकणी पोहचण्यासाठी खंडव्यापासून प्रत्येक अर्ध्या तासाला एक बस मिळते. रेल्वेमार्ग- खंडवा ते बीड रेल्वेस्टेशनपर्यंतच्या प्रवासानंतर, येथून पीपल्या गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी शटल रेल्वेचीदेखील सुविधा आहे.

No comments: