Friday, November 14, 2008

पंढरपूर


गेली शेकडो वर्षे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या हृदयात अनेक पिढ्या सर्वोच्च श्रद्धास्थान बनून असलेलं हे तीर्थस्थान वारकरी संप्रदायाचं आणि संत महंतांचं आदिदैवत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक संतकवीने पंढरपूर आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचा अगाध महिमा मोठ्या भक्तीभावाने वर्णन केला आहे. `माझे माहेर पंढरी', `तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल' अशा समर्पित भावनेने लिहिलेले असंख्य अभंग म्हणजे मराठी भाषेतील उत्कट भावकाव्य होय.चंद्रभागेकाठी असलेल्या या तीर्थस्थानी विठ्ठल व रूक्मिणीची भव्य प्राचीन मंदिरे आहेत. अलिकडे भक्तांची वर्दळ लक्षात घेऊन मंदिरात दर्शनार्थीसाठी अनेक सोयी केल्या आहेत. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे फार मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र व कर्नाटकातील लक्षावधी वारकरी दिंड्या व पालख्या घेऊन या यात्रेस पायी येतात.मोठं तीर्थस्थान असल्याने या क्षेत्री असंख्य देवालये व मठ आहेत. लक्ष्मी, पुंडलिक, विष्णुपद, त्र्यंबकेश्वर, मल्लिकार्जून, श्रीराम, अंबाबाई, नामदेव यांची प्रेक्षणीय मंदिरे आहेत. अनेक संत सत्पुरूषांच्या समाध्या पंढरपूरच्या परिसरात विराजमान आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच नामदेवाची पायरी आहे. संत जनाबाईचं घर असलेलं गोपाळपुरा हे स्थानही प्रेक्षणीय आहे.पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान असून या स्थानाचे महात्म्य महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात दूरवर पसरलेले आहे

No comments: